पालघर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'सन १९४२ च्या 'चले जाओ' आंदोलनामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. या शहिदांचे स्मारक उभारण्यात आलेल्या पालघरच्या हुतात्मा चौकात ह्या शूरवीरांना आज मानवंदना देण्यात आली.
सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाचजण स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देताना शहीद झाले. याप्रसंगी पालकमंत्री विष्णू सावरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, विध्यार्थी आणि मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनतेने या शूरवीरांना वंदन केले.
सर्व परिसर या शूरवीरांच्या देशसेवेची आणि बलिदानाची यशोगाथा ऐकून प्रेरित झाला होता. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी आर्यन हायस्कूल ते हुतात्मा चौक पर्यंत या शूरवीरांच्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी मूक मोर्चा काढला.